Thursday, September 6, 2018

राखीगढीचा संदेश  
(The message of Rakhigarhi)
हरियाणातील राखीगढी इथे ४५०० वर्षांपूर्वीचे (म्हणजे इ स पूर्व २५०० च्या दरम्यानचे) मानवी सांगाडे सापडले आहेत. त्यापैकी १४८ सांगाड्यांची जनुकीय चाचणी करून संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय की वैदिक आर्य हे मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून (Central Asian Steppe) आले नव्हते. त्यामुळे वैदिक युग निर्माण करणारे लोक हे स्थानिक भारतीयच होते. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू वसंत शिंदे आणि लखनौ येथील बिरबल साहनी डीएनए संस्थेचे प्रमुख नीरज राय यांनी हे निष्कर्ष काढले आहेत.
(संदर्भ - इकॉनॉमिक टाइम्स, १३ जून २०१८) 

या संशोधनाचे निष्कर्ष थोडक्यात खालीलप्रमाणे :- 
१. राखीगढीमधील लोक हे वैदिक संस्कृतीशी संबंध असणारे किंवा ती निर्माण करणारे नव्हते. कारण आर्यांचा निदर्शक म्हणून स्थूलपणे ओळखला जाणारा R1a1  हा जीन त्यांच्यात सापडत नाही.   
२. सध्याच्या भारतीयांशी मात्र त्यांची जनुके जुळतात. 
३. हे लोक आर्य नसून द्रविड होते. (राय यांच्या म्हणण्याप्रमाणे-) हे लोक 'निलगिरी' मधील 'इरुला' या आदिवासी जमातींपैकी असावेत.    
४. उत्तर भारतीयांपेक्षा दक्षिण भारतीयांशीच त्यांचं अधिक साम्य आहे. 
५. मात्र या लोकांचं 'इराणी शेतकरी' या संबोधनाने ओळखल्या जाणाऱ्या लोकांशी मिश्रण झालं असावं असंही निश्चितपणे दिसून आलं आहे.  (The result show clear evidence of mixing with another population from outside the subcontinent, labelled as 'Iranian Agriculturist'.)   
६. शेतीचं तंत्र या लोकांनी पश्चिम आशियातून आलेल्या लोकांकडून उचललं असावं. 
(संदर्भ - इंडिया टुडे, ३१ ऑगस्ट २०१८)  

माझ्या मते हे निष्कर्ष अत्यंत उतावीळपणे व अन्य शास्त्रांचा विचार न करता किंवा कुठलातरी विशिष्ठ हेतू मनात ठेवून काढले असावेत. याची कारणं खालीलप्रमाणे,

अ) १९२० सालापासून हडप्पा आणि मोहेंजोदडो उत्खनने जेव्हा जेव्हा केली गेली आहेत, तेव्हा तेव्हा निष्कर्ष बदलत गेले आहेत. उदा. सिंधू नावाची संस्कृती इ स पूर्व २००० वर्षांपूर्वी होऊन गेली आणि आर्यांपेक्षा ती वेगळी होती हा पहिला निष्कर्ष होता. त्यानंतर 'पूर्व सिंधू', 'उत्तर सिंधू' वगैरे करत सिंधू संस्कृतीचा काळ मागे जात राहिला. आता तो (हडप्पातील राखीगढीसकट) इ स पूर्व ७००० वर्षांच्या पलीकडे पोहोचला आहे. एवढंच नव्हे, तर ती आर्यांचीच संस्कृती असावी असा अंदाज उत्खननांत सापडलेल्या द्यूतमंडले, यज्ञकुंड, त्रिमुखीदेवी इत्यादींच्या आधारे करण्यात आला आहे. (मधुकर ढवळीकर यांची पुस्तके पहा.) मात्र माझ्या मताप्रमाणे ती आर्य आणि पणि यांची संयुक्त वसाहत असावी. पणि हे स्थानिक आद्य 'व्यापारी' होते.     

ब) वरील संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांचाच तपशील आलाय. भारताला १०,००० वर्षांचा इतिहास आहे हे सदर निष्कर्ष काढताना विसरलं गेलं आहे. शिवाय हे सांगाडे म्हणजे आर्यांचं किंवा तत्कालीन भारताचं 'प्रातिनिधिक चित्र' असल्याचंही गृहीत धरण्यात आलं आहे. याला उतावीळपणाशिहय दुसरं काय म्हणणार ? आर्यांच्या सर्वसमावेशक धोरणामुळे पणि, दास, नाग आदी स्थानिक जमातींशी त्यांनी जमवून घेतलं होतं आणि त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहारही केले होते हे सर्वमान्य आहे. अशाच एखाद्या जमातीचीसुद्धा ही जनुके असू शकतील. त्यावरून 'सिंधू संस्कृतीतले लोक आर्य नव्हते' असा सिद्धांत मांडणं अशास्त्रीय आहे.         
क) 'आर्य-द्रविड' ही रॉबर्ट काल्डवेल या मिशनऱ्याने हेतुतः केलेली कृत्रिम विभागणी होती हे भारतातील संशोधकांना केव्हाच मान्य झालं आहे.  त्याने द्राविडी भाषेला दहा विशिष्ट निकष लावून भाषेच्या आधारे ही विभागणी केली होती. पण द्राविडी भाषेचे हे निकष संस्कृत, हिंदी व मराठी भाषेलाही कसे लागू होतात हे आता संशोधकांनी दाखवून दिलं आहे. (पहा- 'The Aryan Problem', १९९३.) शिवाय मनुस्मृतीप्रमाणे 'पंचद्रविड' हे मुळात 'काश्यप' असून काही काळ वैदिक विधी न केल्याने वर्णबाह्य झालेले लोक होते. मात्र पुढे ते एवढे वर्णबद्ध झाले, की आग्नेय आशियातील सर्व देशांमध्ये वैदिक संस्कृती नेण्याचं श्रेय मुख्यतः त्यांनाच जातं. 

ड) मुळात 'आर्य' हा एखादा वंश किंवा भाषिक गट नसून ती एक 'संस्कृती' होती. आर्य हा शब्द ऋग्वेदात ३६ वेळा व यजुर्वेदात १५ वेळा आला आहे. शिवाय अन्य वेद, वैदिक वाङ्मय, योगवासिष्ठ, गीता, महाभारत असा अनेक ठिकाणी तो काहीवेळा आला असून बहुतेकदा तो 'संस्कृती' या अर्थानेच आला आहे. त्यामुळे आर्य म्हणजे उंच, गोरे व नाकेले असलेच पाहिजेत असा काही नियम नाही. पण गंमत म्हणजे 'राखीगढीमधील पुरुष हे आजच्या हरियाणामधल्या पुरुषांप्रमाणेच ६ फूट उंच आणि तरतरीत नाकडोळे असलेले होते' असंही शिंदे म्हणतात. (संदर्भ - आऊटलूक, १३ ऑगस्ट २०१८) मग द्रविडी जनुके आणि उंच, गोरे, तरतरीत नाकडोळे ही आर्यांची शारीरिक वैशिष्ट्ये एकमेकांशी कशी जुळू शकतात हे जनुकतज्ञ नीरज राय यांनी दाखवून द्यायला पाहजे होतं. पण तसा खुलासा त्यांनी केलेला नाही. या दोन संशोधकांतच एकवाक्यता नाही असं इथे दिसून येत आहे.     

इ) आर्य (किंवा वैदिक) संस्कृती निर्माण करणारे लोक हे 'मध्य आशिया'तून आलेले कधीच नव्हते. ते आर्मेनिया, अझरबैजान आणि इराण या कश्यप समुद्राच्या (Caspian sea) पश्चिम किनाऱ्यावरील देशांमधून (म्हणजे पश्चिम आशियातून) भारतात आले हेच सत्य आहे. वरील निष्कर्षांमधूनही अंशतः का होईना, पण तेच सिद्ध होत आहे. काही काळाने ते पूर्णतः सिद्ध होईल यात शंका नाही.  

फ) जनुकीय चाचणी करणाऱ्यांची पात्रता व निष्कर्षांची अचूकता नेमकी काय आहे हाही एक प्रश्नच आहे. 'Current Biology' या वैज्ञानिक नियतकालिकात ७ ऑगस्ट २००८ रोजी प्रसिद्ध झालेल्या जनुकीय निष्कर्षांप्रमाणे 'फिनिश लोक वगळता युरोपातील बाकीचे सर्व लोक हे नॉर्डिक व कोकेशियन वंशाचे आहेत. ते आर्य नाहीत'. भारतीय हे अर्थातच त्यांनी आर्य ठरवले आहेत. जयंत नारळीकर संपादित 'Nature'  या वैज्ञानिक साप्ताहिकात (२३ सप्टेंबर २००९) अमेरिकेतील मेरीलँड मधील 'हॉपकिन्स' संस्थेतील जनुक संशोधक अरविंद चक्रवर्ती म्हणतात, 'बहुतेक भारतीय जनुकीय दृष्ट्या एकच आहेत'. तुम्ही जर इंटरनेटवर उत्तर व दक्षिण भारतीयांच्या जनुकीय चाचणीविषयी शोध घेतलात, तर तुम्हाला वेगवेगळे निष्कर्ष पाहायला मिळतील. आर्य आणि द्रविड हे 'वेगळे आहेत' किंवा 'वेगळे नाहीत' अशी दोन्ही टोकाची मते पाहायला मिळतील. याचाच अर्थ कुठलीही एक जनुकीय चाचणी ही बरोबर असल्याचं गृहीत धरता येणार नाही आणि त्यावर अवलंबून राहता येणार नाही. अन्य शास्त्रांचाही आधार घ्यावा लागेल. शिंदे-राय जोडगोळीने तो घेतलेला नाही. म्हणून मी त्यांच्या निष्कर्षांना 'उतावीळ निष्कर्ष' म्हणतो.
तात्पर्य,  
१. या जनुकीय संशोधनातून 'वैदिक युग' निर्माण करणारे 'स्थानिक' लोक होते हे अजिबात सिद्ध होत नाही.   
२. 'आर्य' ही ज्यांची संस्कृती होती ते लोक पश्चिम आशियातून अंदाजे दहा हजार वर्षांपूर्वी  भारतात आले. पण या संशोधनात केवळ ४५०० वर्षांपूर्वीचे सांगाडे विचारात घेतले आहेत.    
३. आर्य आणि द्रविड हे मुळात वेगळे नव्हते. पण इथे ते वेगळे असल्याचं मानलं आहे.   
४. बाहेरून आलेल्या आर्यांचं पणि, दास, नाग इत्यादी स्थानिक जमातींचं बेमालूम पण अभिमानास्पद असं सांस्कृतिक सामरस्य झालं आहे. पण या संशोधनाने त्याची दखल न घेताच निष्कर्ष दिले आहेत.    

एकंदरीत 'राखीगढी' चा काही 'संदेश' असला तर तो हाच आहे, की केवळ जनुकीय शास्त्राच्या आधारे उड्या न मारता मानववंश, खगोल, पुरातत्व, साहित्य इत्यादी अन्य शास्त्रेही पडताळून पहा व मगच निष्कर्ष काढा. 
दुर्दैवाने शिंदे आणि राय यांनी हे केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.             

Monday, July 9, 2018

धोकादायक मार्क्सवादी इतिहासकार 
(Dangerous Marxist Historians) 
भारतीय इतिहासाचं नुकसान करणाऱ्या इतिहासकारांचे माझ्या मते तीन गट पडतात. 
पहिला; कष्टाळू पण इंग्रजांवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या 'उपकृत' इतिहासकारांचा.  
दुसरा; तथाकथित 'देशभक्त' नि टोकाच्या हिंदुत्ववादी इतिहासकारांचा. 
आणि तिसरा; छुप्या वा उघड कम्युनिस्ट इतिहासकारांचा.      
वरील तिघांपैकी भारतीय इतिहासाचं सर्वात जास्त नुकसान कुणी केलं असेल, तर ते कम्युनिस्ट किंवा मार्क्सवादी इतिहासकारांनी केलं आहे. हे इतिहासकार भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत 'धोकादायक' आहेत असं एकंदरीत माझं मत झालंय.   
१९६२ च्या चीन युद्धात देशद्रोह करणाऱ्या कम्युनिस्टांचा वारसा आजही चालवणाऱ्या या इतिहासकारांची लक्षणं त्यांच्या पुस्तकांमधील वा व्याख्यानांमधील खालील मांडणीवरून ओळखता येतात -  
१. इंग्रजांची (बनावट) कालगणना खरी मानणे व भारतीय इतिहास वाटतो तितका 'प्राचीन' नसल्याचे भासवणे. 
२. आर्यांपेक्षा अनार्यांची किंवा असुरांची संस्कृती 'उच्च' मानणे नि आर्यांची संस्कृती 'हीन' दाखवणे.    
३. रामायण व महाभारत ही केवळ 'काव्येच' आहेत असे सांगणे. 
४. राम किंवा कृष्णासारखे लोकोत्तर पुरुष आर्य नसून अनार्य, असुर, परदेशी किंवा काल्पनिक मानणे.     
५. 'मनुस्मृती' सारखे प्राचीन ग्रंथ बदनाम करणे व चार्वाकांसारख्या भोगवादी पाखंड्यांचे अनावश्यक उदात्तीकरण करणे. 
६. आर्य- अनार्य, वैदिक- अवैदिक, ब्राह्मण- ब्राह्मणेतर अशाप्रकारचे वाद नव्याने उकरून काढून समाजात फूट पाडणे.   
हे सगळं करण्यामागे एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे 'भारतीय इतिहास व संस्कृती किती क्षुद्र व थिटी आहे; आणि मार्क्सवाद हाच त्यावर एकमेव अक्सीर उपाय कसा आहे' हे भारतीयांच्या मनावर बिंबवणं. कुठलाही अभ्यास न करता स्वतः ला 'बुद्धिवादी' समजणारे सुशिक्षित पण 'अर्धवट' लोक याला बळी पडतात नि या इतिहासकारांचं फावतं.             
ज्या मार्क्सवादी इतिहासकारांनी हे सगळं केलं यापैकी काहीजणांची यादी इथे देणं औचित्यपूर्ण ठरेल. 
ही यादी अशी,  
१. दामोदर कोसंबी
२. रोमिला थापर 
३. राम शरण शर्मा 
४. कॉ. शरद पाटील 
५. नरहर कुरुंदकर 
६. डॉ. आ. ह. साळुंखे 
या यादीतले काही इतिहासकार उघडपणे आपण मार्क्सवादी असल्याचं कबूल करतात, तर उरलेले मानवतावादाचा मुखवटा तोंडावर चढवून आपण मार्क्सवादी असल्याचं नाकारत असतात. मात्र त्यांची कृती व कलाकृती यावरून ते कोण आहेत हे उघड दिसून येत असतं. यातली काही मंडळी मानवाधिकार किंवा सांस्कृतिक किंवा इतिहास विषयक समित्यांमध्ये घुसून मोक्याच्या जागा पटकावतात आणि आपलं इप्सित साध्य करून घेतात. अशा या धोकादायक  इतिहासकारांच्या विषग्रस्त मांडणीची थोडक्यात उदाहरणं देतो.  

कोसंबी हे 'आर्य स्थानिक अनार्यांच्या तुलनेत सुधारलेले नव्हते' असं निराधार विधान करतात. (पृ. ८२, 'प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता') 'वेद हे बायबलच्या तुलनेत कमी आहेत' (पृ. ८५),  'कृष्ण हा असुर होता', आजचे (जिजाबाईच्या माहेरचे) जाधव उर्फ यादव हे बनावट आहेत (पृ. १२८ ते १३५) अशी अफाट व निराधार विधानही ते करतात.
रोमिला थापर आपल्या 'Ancient Indian Social History'  या पुस्तकात 'महाभारताचा इ.स.पूर्व ३१०२ हा काळ खोटा आहे' (पृ.२८५), 'पुराणांतल्या वंशावळी खोट्या आहेत' (पृ. २५५), 'आर्यांपेक्षा अनार्यांची संस्कृतीच उच्च होती' (पृ. २५६), 'ऋग्वेद प्राचीन नाही' (पृ. २५७) असं उच्चारवाने सांगतात. 
'Communalism and the Writing of Indian History' या ग्रंथातही रोमिलाबाई 'भारतीय इतिहासाचे अकारण उदात्तीकरण केले आहे' (पृ. ५), 'वैदिक किंवा हिंदू यांच्यापेक्षा बौद्ध आणि परदेशी लोकांनीच भारतीय कला नि संस्कृती श्रीमंत केली आहे' (पृ. ११) अशा अर्थाची विधाने बिनबोभाटपणे करतात.  
(खुलासा : अलीकडे मात्र रोमिलाबाईंना उपरती होऊ लागली आहे हे त्यांच्या युट्यूबवरील मुलाखती पाहून लक्षात येतंय. पुराणे विश्वसनीय आहेत, रामायण-महाभारत खरोखरच घडून गेलं, महाभारत काळ इ.स.पूर्व ३१०२ हा आहे इत्यादी गोष्टींवर आता त्यांचा विश्वास बसू लागल्याचं दिसत आहे. भारतीय इतिहास नि संस्कृती आधी 'हीन' लेखून नंतर ती 'महान' असल्याची उपरती झाल्याचं मॅक्सम्युलरनंतरचं माझ्या समजुतीप्रमाणे हे पाहिलंच उदाहरण.)

दोन वेळा भारत सरकारचा 'पद्मभूषण' 'किताब नाकारणाऱ्या रोमिलाबाईंनी २००८ साली पाच लाख डॉलरचं (साडेतीन कोटी रुपये) 'क्लुग' नामक अमेरिकन पारितोषिक स्वीकारायला मात्र अनमान केला नाही. कम्युनिस्टांचा अड्डा असणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केलं आहे. २०१८ साली काही माओवादी विचारवंतांना पोलिसांनी अटक केल्यावर त्याविरोधात पहिली याचिका न्यायालयात सादर करणाऱ्या रोमोलाबाईंनी आपण कोण आहोत हे पुन्हा एकदा कृतीनेच सिद्ध केलं होतं    

राम शरण शर्मा यांचीही सगळी मांडणी मार्क्सवादी आणि हिंदू विरोधी असल्याचं दिसून येतं. 'प्राचीन भारत' नामक दहावीच्या पाठ्यपुस्तकात 'रामायण आणि महाभारत घडलं याला काही पुरावा नाही' असं ठाम विधान करून त्यांनी तरुण मुलांच्या मनात भारतीय इतिहासाविषयी संदिग्धता निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्या पुस्तकावर १९७७ मध्ये जनता पक्षाला बंदी घालावी लागली होती. अयोध्या आणि गुजरात दंगल प्रकरणांमध्ये शर्मा यांनी नेहमीच मुसलमानांची बाजू घेतली आहे. अयोध्या हे हिंदूंचं तीर्थक्षेत्र असल्याचा कुठलाही पुरावा नाही असं ते ठासून सांगतात.      

कॉ. शरद पाटील यांनीही आर्यांपेक्षा अनार्यांची संस्कृती कशी 'उच्च' होती हे सांगण्यात हयात घालवली आहे. याबाबतीत त्यांची मजल एवढ्या पुढे गेलीय, की 'वर्णव्यवस्था ही मुळात अनार्यांची होती व ती पुढे आर्यांनी उचलली' असं सांगायलाही त्यांनी कमी केलेलं नाही. मात्र आधीची व्यवस्था 'समतेवर' आधारित होती तर नंतरची (म्हणजे आर्यांची) 'विषमतेवर' आधारित बनली' (पृ. ५, प्रस्तावना, 'दासशूद्रांची गुलामगिरी' खंड १ भाग २) असं निराधार विधान करून त्यांनी तो विषय गुंडाळला आहे. 'नैऋती' या वेदातील 'अशुभा'च्या देवतेला ते अनार्यांची देवता ठरवून 'सुपीकतेची'ही देवता ठरवायला जातात (पृ. ३ व ४) हा सुद्धा असाच एक निरर्थक अभिनिवेशाचाच प्रकार होय.

नरहर कुरुंदकर हे एकाच वेळी अनेक डगरींवर हात ठेवणारे महाराष्ट्रातील एक 'तुच्छतावादी' विद्वान. आपण 'मार्क्सवादी' असल्याची कबुली त्यांनी 'मनुस्मृती' या त्यांच्या पुस्तकात दिली आहे. (पृ. ८७ पहा.) 'मनू अस्पृश्यता पाळत नाही' असं डॉ. आंबेडकरांचं मत होतं. पण कुरुंदकर त्यांना खोडून काढतात व म्हणतात, 'मनू अस्पृश्यता पाळतो असे माझे मत आहे.' (पृ. ६५) या विधानाच्या पुष्ट्यर्थ कुरुंदकर 'प्रक्षिप्त' म्हणून उघडपणे माहीत असलेल्या श्लोकांची तीच तीच उदाहरणे देत राहतात. चार्वाकाला तर कुरुंदकर आर्यांपेक्षा अधिक मार्क देतात आणि 'ते काळाच्या १५०० वर्षे पुढे होते' असं आधारहीन विधान करतात. (पहा, 'लोकायत' हा लेख, मागोवा, देशमुख आणि कं.)
डॉ. आ.ह.साळुंखे यांच्यावर एरीक फ्रॉम या मार्क्सवादी विचारवंतांच्या साहित्याचा प्रभाव आहे. त्यांनी फ्रॉम याच्या एका पुस्तकाचा अनुवादही केलाय. कुठलाही हाडाचा मार्क्सवादी समता आणि मानवतावाद यांचा नेहमी  उद्घोष करत असतो तसा फ्रॉम आणि त्यांचे शिष्य डॉ. साळुंखेही तो कायम करताना आढळतात.मात्र प्रत्यक्षात ही मंडळी द्वेषाची पेरणी करण्यात मग्न असतात. डॉ. साळुंखे यांनी चार्वाकावर चक्क 'पीएचडी' च केली असून त्याला त्यांनी 'आस्तिक शिरोमणी' ही ठरवून टाकलं आहे. आपल्या तल्लख नि लबाड युक्तिवादाने ते आर्य, वैदिक, ब्राहमण यांच्यावर सातत्याने झोड उठवून अनार्य, असुर, चार्वाक अशा आता अस्तित्वात नसलेल्या गोष्टी उकरून काढत असतात नि समाजाचा बुद्धिभेद करून मानसिक व भावनिक फूट पाडत असतात. वानगीदाखल त्यांचे 'ना गुलाम, ना उद्दाम', 'चार्वाक दर्शन', 'बळीवंश' वगैरे ग्रंथ वाचून पाहावेत. ते वाचले म्हणजे संभाजी ब्रिगेड सारख्या समाजद्रोही संस्था कुठल्या विचार प्रवाहातून निर्माण झाल्या आहेत हे ताबडतोब लक्षात येऊ शकतं. असो. 
माझ्या परीने मी यातल्या बहुतेकांची मते 'साधार' खोडून काढली असून समाजातील एकात्मता व सौहार्द टिकवण्याचा नि आपल्या भव्य इतिहासाला चूड लागू न देण्याचा प्रयत्न माझ्या पुस्तकांमधून नि ब्लॉगमधून केला आहे. पण हा लेख लिहिण्यामागचा मुख्य हेतू तरुण इतिहास-अभ्यासकांनी सतत सावध राहून कोणतेही पूर्वग्रह न बाळगता आपला अभ्यास करावा हाच आहे. तो साध्य झाला तरच आपल्या पुराणेतिहासाला काही भवितव्य आहे.