Thursday, January 5, 2017

राजसंन्यास : मराठी साहित्याचं एक सौंदर्यलेणं !
राम गणेश गडकरी यांना 'मराठी भाषेचे शेक्सपियर' असं म्हटलं जातं, कारण शेक्सपियरने जशा अजरामर व्यक्तिरेखा नाटकांमधून निर्माण केल्या तशाच गडकरी यांनीही आपल्या मोजक्या नाटकांमधून निर्माण केल्या. शेक्सपियर अभ्यासक विनय हर्डीकर यांच्या मते शेक्सपियरच्या चाळीसएक, तर गडकरी यांच्या जवळपास पंधरा व्यक्तिरेखा अमर ठरल्या आहेत. 'हॅम्लेट' ज्याप्रमाणे शेक्सपियरची सर्वोत्कृष्ट कलाकृती मानली जाते, त्याप्रमाणेच गडकरी यांची 'राजसंन्यास' (अपूर्ण असूनही) सर्वोत्कृष्ट मानली जाते. हे नाटक १०० वर्षांपूर्वी लिहिलं गेलं तेव्हा छत्रपती संभाजीराजांवर फार संशोधन झालं नव्हतं आणि त्यांच्यावर काही दोषारोप केले जात होते. तरीही गडकरी यांनी संभाजीला नायक बनवून अशा चतुराईने मांडणी केली आहे की प्रचलित समज आणि त्यांचं खंडन हे तिथल्या तिथेच होऊन जातं. 'संभाजीची बदनामी झाली' असा निर्बुद्ध आरोप ज्यावरून आज होतोय  तो ५ व्या अंकातील मजकूर म्हणजे संभाजीचे आत्मनिर्भत्सनेचे संवाद आहेत. आत्मप्रौढी किंवा आत्मनिर्भत्सना या भावनेच्या भरात केल्या जात असल्यामुळे त्यात सत्याचा अंश फारच थोडा असू शकतो. याउलट अन्य कुणी केलेल्या विश्लेषणात किंवा खंडनात सत्याचा अंश जास्तीत जास्त असण्याचा संभव असतो. या नाटकात साबाजीसारखी पात्रं संभाजीवरील आरोप खोडून काढतात आणि राजा किती महान शूरवीर आहे हे पुन्हा पुन्हा सांगत राहतात. पण सोयीचा तेवढा भाग घेऊन धूर्त किंवा निर्बुद्ध लोक अकारण वाद निर्माण करत असतात. या नाटकाचा पहिला, तिसरा नि पाचवा अंकच केवळ गडकरी यांनी लिहिला होता व दुसरा नि चौथा लिहिण्यापुर्वीच ते वारले. (कोल्हटकर-गडकरी-अत्रे या प्रतिभाशाली गुरुशिष्य परंपरेत शेवटचा अंक आधी लिहिणे, मधला शेवटी लिहिणे वगैरे गोष्टी होत होत्या. उदा. 'तो मी नव्हेच !' ) तरीही मांडणीच्या, भाषेच्या नि व्यक्तिरेखांच्या दृष्टिकोनातून हे अपूर्ण नाटक मराठी भाषेचं एक सौंदर्यलेणं ठरलं आहे. आजच्या गडकरीद्वेषाच्या लज्जास्पद पार्श्ववभूमीवर प्रत्येकाने ते जरूर वाचून काढावं आणि गडकरी यांना एक आगळीच आदरांजली वाहावी ही विनंती. (खाली नाटकाची लिंक देत आहे.)